● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

वाचनकट्टा

Saturday 1 September 2018

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्

जन्म आणि बालपण
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी आंध्रप्रदेशातल्या तिरुत्तणी या अतिशय छोट्या खेड्यात झाला. या गावात ना कसल्या सोयी होत्या ना सुविधा. सारे विषय शिकवण्यासाठी एकच शिक्षक असलेल्या शाळेत राधाकृष्णन यांचं प्राथमिक शिक्षण पार पडलं. छोट्या राधाकृष्णन यांची कुशाग्र बुद्धीमत्ता त्यांच्या शिक्षकांनाही चक्रावून टाकणारी होती. ‘बुद्धीनं तल्लख असलेल्या या विद्यार्थ्याला कुठलीही गोष्ट चटकन समजते, त्यासाठी त्याला फारसे कष्ट घ्यावे लागत नाही. उलट कधी कधी तर तो असे प्रश्न विचारतो की त्यामुळे शिक्षकही कोड्यात पडतो’ असं शिक्षक नेहमी म्हणत असतं. डॉ. सर्वपल्ली यांच्या बुद्धीमत्तेला आणि कुशाग्रतेला लहानपणी मिळालेली ही पहिली पावती खूप महत्त्वाची ठरली. 

पोषाख
डॉ. राधाकृष्णन यांचा वेष शुभ्र आणि निर्मळ असायचा. ते अंगात लांब,बंद गळ्याचा शुभ्र जयपुरी कोट घालत. तसंच स्वच्छ पांढरं धोतर नेसत. याशिवाय तेनेहमी डोक्याला दक्षिणी पद्धतीचा फेटा बांधत. हा फेटा 22 हात लांब कापडाचा असे. यापोशाखामुळे त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक आणि रुबाबदार वाटे, तसेच ते मोहक आणितेजस्वीही वाटत.

तत्वज्ञानातील गोडी
तत्वज्ञान हा इतरांसाठी कंटाळवाणा ठरणारा विषय डॉ. राधाकृष्णन यांच्या मात्र खूप आवडीचा विषय होता. त्यामुळे त्यांनी ‘बी.ए’ आणि ‘एम.ए’साठी याच विषयाची निवड केली होती. एकटे असतानाही राधाकृष्णन सतत कसला ना कसला विचार करत बसत. 
विचार करायचा जणू छंदच त्यांना जडला होता. सर्वसामान्य मुलांसारखं सरळधोपट मार्गानं जाणं आणि पैसे कमावणं अशा गोष्टींना त्यांच्या विचारात जागाच नव्हती. 
‘एम.ए’मध्ये आपल्या आवडत्या विषयात प्रथम वर्ग मिळवणाऱ्या अवघ्या २१ वर्षांच्या राधाकृष्णन यांना नोकरी शोधण्यासाठी फारसे कष्ट घ्यायची गरजच लागली नाही. मद्रास इथल्या प्रेसिडेन्सी महाविद्यालयानं त्यांना ‘तत्वज्ञान’ हा विषय शिकवण्यासाठी पाचारण केलं. साहजिकच, राधाकृष्णनं यांनीही संधीचा फायदा घेतला. या महाविद्यालयातील वातावरणात रमले. १९०९ ते १९१६ अशी ऐन तारुण्याची आठ वर्षे त्यांनी याच महाविद्यालयात सेवा बजावली. 

भारतरत्न डॉ. राधाकृष्णन
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी बनारस हिंदू विद्यापीठाला एक वेगळीच उंची गाठून दिली. भरभराट केली. त्रिखंडात नाव मिळाले. (1948). शिक्षणक्षेत्रात त्यांनी जिथे जिथे पाय ठेवले, जे पद स्वीकारले त्याचे ़डॉ. सर्वपल्लींनी केवळ सोनेच केले. प्रसन्न, तेजस्वी, चित्ताकर्षक, मोहक, अभ्यासू असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्याची सर्वांवर चांगलीच मोहिनी पडे. छाप पडे. त्यांच्या सहवासात येणाऱ्यांचे डोळे त्यांच्या सहवासाने. दीपत! त्यांच्या या गुणांचा नि कर्तृत्वाचा परिपाक म्हणूनच की काय, भारत सरकारने त्यांना `भारतरत्न` हा किताब देऊन गौरविले.

१२ मे १९६२ रोजी झाले राष्ट्रपती
भारताच्या इतिहासातातील हा सोन्याचा दिवस. तेजस्वी दिवस. या दिवसाची नोंद भारताच्या सुवर्णक्षरांनीच केला जाईल. या आधीचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद. एक तप राष्ट्रपतीपदाची धुरा वाहून ते सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले. 
त्यांच्या जागी भारताचे नवे राष्ट्रपती कोण होणार, हा प्रश्नच उरला नाही. कारण स्वत:च डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी डॉय सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचे नाव या पदासाठी सुचविले. अन् हा वाद उभाच राहिला खेळावा लागला नाही. 
या निवडीमुळे जगाच्या कानाकोपऱ्यातील आबालवृद्धांना, तत्वज्ञ मंडळींना मनस्वी आनंद झाला. `भारताच्या या सर्वोच्च पदावर आपला माणूस विराजमान झाला आहे`.
ही भावनाच त्यांना सुखावून गेली. जगाच्या कानाकोपाऱ्यातून अभिनंदनाच्या तारा आल्या. कौतुकाचा नुसता वर्षाव झाला. आपल्या शेजारचे राष्ट्र नेपाळ. तिथल्या नरेंशापासून थेट अमेरिका, इंग्लंड, रशिया, जपान, इ. नव्हे तर त्यांना सर्वतोपरी सहकार्य देण्याचे आश्वासनही दिले. 
राष्ट्रपतीपदावर आरूढ होण्यापूर्वी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी एक थोर तत्वज्ञ म्हणून भारताभूमीची महनीय सेवा बजाविली होती. तिचे पांग फेडले होते. तिचे नाव उभ्या जगात रोशन केले होते. ज्या ज्या क्षेत्रात त्यांनी पाऊल ठेवले, जे जे पद भूषविले तिथे तिथे त्यांनी आपल्या पावलांचा दमदार ठसा उमटविला. त्या त्या पदावर असामान्य अन् अपूर्व कामगिरी केली होती. अजोड कर्तृत्व करून दाखविले होते. देशाची पत नि इभ्रत वाढविली होती. म्हणून असावे, या थोर तत्वज्ञाकडे अन् प्राचीन इतिहास व परंपरा असलेल्या त्याच्या भारताकडे वेगळ्या नजरेने नि अपेक्षेने उभे जग पाहात होते ! आदराने नतमस्तक झाले होते. 
आंतरराष्ट्रीय नि जागतिक कामगिरी बजाविणाऱ्या युनेस्कोसारख्या संघटनेत मोलाची, महत्त्वाची अशी शैक्षणिक, सामाजिक नि सांस्कृतिक कामगिरी बजावून डॉ. राधाकृष्णन मायदेशी परतले अन् त्यांनी भारतात पाऊल ठेवताच भारत सरकारने त्यांचा जंगी सत्कार केला. थाटामाटात मोठा गौरव केला.

विदेशाची इच्छा
राधाकृष्णन यांना तरुण वयातच म्हैसूर विद्यापीठात तत्वज्ञान याविषयाचे विभागप्रमुख म्हणून नेमण्यात आलं. येथे त्यांनी हिंदू तत्वज्ञानाचा गाढा अभ्यासकरून आपला व्यासंग वाढवला.
हिंदू धर्म आणि तत्वज्ञान सगळ्या धर्मांहून कसं श्रेष्ठआहे, हे जगाला सप्रमाण दाखवलं. ते कधीही विदेशात शिकण्यासाठी गेले नव्हते. तेनेहमी म्हणत, “आपल्या देशात कुठल्याही ज्ञानाला कमी नसताना विदेशात शिकण्यासाठी का जाऊ? शिकण्यापेक्षा तेथील लोकांनाशिकवण्यासाठी जायला मला आवडेल.” पुढे ते ऑक्सफर्ड विद्यापीठाततत्वज्ञान विषय शिकवण्यास रवाना झाले.

परदेश वाऱ्या गाजल्या
म्हैसूरच्या विद्यापीठात तीन वर्षे प्राध्यापकी केल्यावर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् कोलकाता विद्यापीठात अध्यापनासाठी दाखल झाले. आशुतोष मुखर्जी यांनीच डॉक्टरसाहेबांना तशी गळ घातली होती. कोलकाता विद्यापीठातही `एक विद्यार्थीप्रिय अध्यापक` म्हणून त्यांचे नाव झाले. दबदबा वाढला.
कोलकात्याच्या याच मुक्कामात तिथल्या `पंचम् जॉर्ज व्याख्यानमाले `त व्याख्याने देण्यासाठी त्यांना बोलावण्यात आले. हे आमंत्रण मानाचे समजले जाई. त्यांची या व्याख्यानमालेतील सर्व भाषणे रसिक श्रोत्यांच्या मनाची पकड घेऊन गेली. डॉक्टरसाहेबांची सर्वत्र गौरव झाला.
याच सुमारास म्हणजे १९२६ साली इंग्लंडमध्ये एक `आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान परिषद` भरविण्यात आली होती. तिचे महनीय वक्ते म्हणून डॉ. सर्वपल्लींना मानाचे आमंत्रण आले अन् ते त्यासाठी लंडनला गेले.
या परिषदेला देशोदेशींचे नामवंक, विख्यात तत्वज्ञ आणि विचारवंत उपस्थित होते. मात्र, डॉ. राधाकृष्ण यांनी बाजी मारली. त्यांची या परिषदेतील भाषणे विद्वत्तापूर्ण, व्यासंगपूर्ण झाली. त्यांच्या भाषणांना मोठा समुदाय उपस्थित राहायचा. त्यांच्या वाणीमुळे आणि वकृत्वामुळे ते लोकांतमध्ये प्रिय होते.

धारधार लेखणी
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा सर्वात आवडता विषय होता तो लेखन. शालेय जीवनापासूनच त्यांनी हा लेखनाचा छंद जोपासला होता. आपली मते, विचार ते निर्भीडपणे मांडीत आणि लिहीत. आपल्या लेखनातून सतत ते सत्याचाच पाठपुरावा करीत. त्यांच्या लेखनाला एक वेगळीच धार होती. तेज होते. त्यांचे लेखन मोजकेच होते. पण विचार करायाला लावणारे होते.
तत्वज्ञान हा तर त्यांचा सर्वात आवडता विषय. या विषयावर त्यांनी अनेक कसदार लेख विविध नियतकालिकांतून लिहिले. निरनिराळ्या विषयांवरील त्यांच्या ग्रंथाना सखोल तत्वज्ञानाची जोड मिळाली होती. साहजिकच या ग्रंथानी आम दुनियेत वाहवा मिळविली. त्यांचे ग्रंथ म्हणजे भारत देशाचा अमोल ठेवाच आहे. ते एक मैल्यवान लेणे होते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांनी मोजकेच ग्रंथ लिहिले. पण त्या ग्रंथांनी त्यांना प्रसिद्धीच्या उंच शिखरावर नेऊन ठेवले. या ग्रंथांची नावे जरी नजरेखालून घातली तरी त्यातील विषयांची विविधता उमगेल.

१. भारतीय तत्वज्ञान- भाग २
२. भारतीय तत्वज्ञान- भाग २
३. आजचा आवश्यक नवा धर्म
४. अर्वाचीन तत्वज्ञान धर्माचे स्थान
५. हिंदू तत्त्वज्ञान आणि जीवनविषयक तत्त्वे
६. तत्त्वज्ञानाची जीवनविषयक मते
७. पौर्वात्य धर्म व पाश्चात्य शास्त्रे
८. अर्वाचीन भारतीय तत्त्वज्ञान
९. महात्मा गांधी
१०. पौर्वात्य व पाश्चिमात्य धर्म
१२. भगवदगीता
१३. बुद्ध व त्याचे धम्मपद
१४. प्रमुख उपनिषदे व त्यांचे तत्त्वज्ञान
१५. जागतिक तत्त्वज्ञानाचा इतिहास

त्यांची ही पुस्तके भारतीय तत्त्वज्ञानाची, धर्माची आणि संस्कृतिची ओळख करून देतात. त्यांनी भारतीय तत्त्वज्ञान, धर्म व संस्कृती यांची ध्वजा दाही दिशांना सतत उंचच उंच फडकवित ठेवली. ही भारतीय साहित्याचे थोर सेवाच ठरली आहे.
भारताबाहेरील अनेक टीकाकार भारतीयांना प्राणापलीकडे प्रिय असणाऱ्या हिंदू धर्मावर, त्याच्या तत्त्वज्ञानावर, आचार-विचार, संस्कृतीवर, रीतिरिवाजावर सडकून टीका करायचे. या टीकेत जहालपण असायचे. विरोधक आणि टीकाकारांना आपल्या धार धार लेखणीने गप्प केले.

डॉ.राधाकृष्णन यांच्याबद्दल दिग्गजांची मते
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या बाबतीत सर्वांच्याच मनामध्ये अपार श्रद्धा अन् आदर होता. थोर राजकारणी, तत्वज्ञ यांचा त्यात प्रामुख्याने समावेश होता. पण असे कशाला, या मंडळींना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी काय वाटते ते पाहू या...

● ‘स्वामी विवेकानंदानंतर भारतीय धर्माबद्दल सरस व्याख्याने करणारा हाच एकमेव थोर वक्ता पाहवयास मिळाला
-प्राचार्य जॅक्स
ऑक्सफर्ड महाविद्यालय, ऑक्सफर्ड


● ‘भारताची प्रतिष्ठा आणि संस्कृती जगात अजरामर करण्यासाठी झगडणारे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक महान योद्धे आहेत. पाश्चिमात्य राष्ट्रंनी विज्ञान आणि कार्यक्षमता जगाला दिली आहे, तर डॉ. राधाकृष्णन यांनी जगाला प्रेम अन् माधुर्य यांचा महान संदेश दिला आहे.’
-रामस्वामी अय्यर


● ‘सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी भारताबाहेर प्रथम आमच्याच व्याख्यानमालेत व्याख्याने देऊन, आमचाच खरा सन्मान केला आहे. गौरव केला आहे. 
-संपादक, हिल्बर्ट


● ‘डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे नवभारताचे तत्वज्ञ आणि पाश्चात्यांना हिंदू धर्माची ओळख करून देणारे विवरणकार आहेत. 
-फ्रान्सिस
डॉन ऑफ इंडिया ग्रंथाचे लेखक


● ‘डॉ. राधाकृष्णन यांना पाश्चात्य नि पौर्वात्य तत्वज्ञानाचे सखोल ज्ञान आहे. पूर्व आणि पश्चिम यांचा हा सुरेख रंगमंच आहे.’
-प्राचार्य जॅक्स 
ऑक्सफर्ड महाविद्यालय


● ‘डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे गौतम बुद्ध या विषयावर इतके सरस, प्रभावी आणि परिणामकारक भाषण झाले की, अमेरिकन समाजाल संभ्रम पडला की, हे गौतम बुद्ध आहेत की सर्वपल्ली राधाकृष्णन 
-एक अमेरिकन लेखक


● सर्वपल्ली राधाकृष्णनसारखा थोर, लायक, सुयोग्य तत्ववेत्यांचे कुशल मार्गदर्शन, नेतृत्त्व बनारस विश्वविद्यालयाला लाभले, तर कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही. चिंतेचे कारण नाही.
-पंडित मदनमोहन मालवीय


● एक थोर तत्वज्ञ राजा, आभाळाएवढा माणूस
-डॉ. प्लेटो


● गेली बारा वर्ष स्वतंत्र भारताची अमोल सेवा त्यांच्या हातून घडली. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णनसारखी ज्ञानी, मुत्सद्दी आणि प्रेमळ व्यक्ती आज राष्ट्राध्यक्ष म्हणून आपणास लाभली ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.
-पंडित जवाहरलाल नेहरू
भारताचे पहिले पंतप्रधान

No comments:

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामगा ता.निलंगा जि.लातूर