● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

वाचनकट्टा

शिवाजी महाराज इतिहास


शिवाजी महाराज इतिहास

उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना जागतिक आणि विशेषत्वाने भारतीय इतिहासात मोलाचे स्थान आहे.

शिवाजी महाराज इतिहास

मराठा साम्राज्य संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात. शत्रुविरुध्ह लढा देताना महाराष्ट्रातल्या डोंगर-दर्‍यांचा अनुकूल वापर करत गनिमी कावा पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि मुख्यतः मुघल साम्राज्य ह्यांच्याशी लढा देत मराठा साम्राज्य उभे केले. आदिलशाही, निजामशाही आणि मुघलसाम्राज्य यांच्या बलाढ्य स्थानिक सरदार, किल्लेदार यांच्या अत्याचार आणि अन्यायापासून शिवाजी महाराज यांनी जनतेची सुटका केली. सामन्यांचे स्वराज्य स्थापन करत एक उत्तम शासनाचे एक उदाहरण त्यांनी भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज इतिहास सोनेरी अक्षरात लिहिला गेला आहे.
आपले वडील शहाजीराजे भोसले यांच्याकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडी वर सुरुवात करत पुढे त्यांनी मराठा साम्राज्यात एक लाख सैनिकांचे लष्कर उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची उभारणी करत मराठा साम्राज्य वाढवले.
महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिव, शिवराय, शिवा अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस हा ‘शिवजयंती’ म्हणून अखंड विश्वभर साजरा होतो.

शिवाजी महाराज जन्म


शहाजीराजे भोसले यांच्या पत्नी राजमाता जिजाऊयांच्या पोटी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इ.स. १९ फेब्रुवारी १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माच्या तारखेवर वादविवाद होते. परंतु महाराष्ट्र सरकारने २००१ साली इतिहासकारांची समिती बनवुन संशोधन करत १९ फेब्रुवारी १६३० ही तारीख शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस म्हणून जाहीर केली.

शिवाजी महाराज यांचे वडील: शहाजीराजे

शहाजीराजे प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या दरबारात सरदार होते. मोगल सम्राट शहाजहानच्या सैन्याने इ.स. १६३६ मधे अहमदनगरवर चाल करत अहमदनगर शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या सैन्यात सरदार म्हणून रूजू झाले. आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली. लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याची जहागिरी सांभाळायला आल्या.

शिवाजी महाराज यांच्या आई: जिजाबाई

जिजाबाई पुण्याची जहागिरी सांभाळायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. जनतेचे अतोनात हाल होते आणि शेतकरी अंधश्रद्धेत बुडाले होते. तेव्हा बाल शिवाजीराजे यांच्यासह जिजाऊ यांनी एका शेतात सोन्याचा नांगर फिरवून पुण्याची पुन:स्थापना करायला सुरुवात केली. शिवाजी महाराज यांच्या बालपणी जिजाऊनी रामायण, महाभारत मधील गोष्टी सांगत त्यांचे संगोपन केले. शिवाजी महाराज यांच्या यशस्वी वाटचालीत आई जिजाऊ यांचे मोलाचे श्रेय असून प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन केले.

शिवाजी महाराज वंशावळ 

पत्नी

सईबाई निंबाळकर
सोयराबाई मॊहिते
पुतळाबाई पालकर
लक्ष्मीबाई विचारे
काशीबाई जाधव
सगुणाबाई शिंदे
गुणवंतीबाई इंगळे
सकवारबाई गायकवाड

मुलगे

छत्रपती संभाजी भोसले
छत्रपती राजारामराजे भोसले

मुली

अंबिकाबाई महाडीक
कमळाबाई (सकवारबाईची कन्या)
दीपाबाई
राजकुंवरबाई शिर्के (सगुणाबाईची मुलगी, गणोजी शिर्के यांची पत्नी)
राणूबाई पाटकर
सखुबाई निंबाळकर (सईबाईची मुलगी)

सुन

संभाजीच्या पत्नी येसूबाई
राजारामांच्या पत्नी ताराबाई (माहेरच्या मोहिते)
जानकीबाई
राजसबाई (राजाराम यांच्या पत्नी)
अंबिकाबाई
सगुणाबाई

नातवंडे

संभाजीचा मुलगा शाहू
ताराबाईची राजारामाची मुलगा दुसरा शिवाजी
राजसबाईचा मुलगा दुसरा संभाजी
शिवाजी महाराज यांचा इतिहास वंशपरंपरेने वाढतच राहिला.

शिवाजी महाराज इतिहास: पहिली स्वारी तोरणगड

इ.स. १६४७ मधे वयाच्या सतराव्या वर्षी शिवाजीराजांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकत स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. पुढे यशस्वी वाटचाल करत शिवाजीराजांनी कोंढाणा(सिंहगड), आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून हिसकावून घेत पुणे प्रांतावर स्वराज्य उभारले. स्वराज्याच्या राजधानीसाठी तोरणगडासमोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकत छत्रपतींनी त्याची डागडुजी करत स्वराज्यात राजगड असा विशालदाय किल्ला घेतला. पुढे राजगड ला स्वराज्याची राजधानी बनवत राजांनी स्वराज्य वाढीस भर दिला आणि अशाप्रकारे शिवाजी महाराज इतिहास काळाला सुरुवात झाली.

अफझलखान वध प्रकरण

आदिलशहाच्या ताब्यातील जवळपास अनेक किल्ले शिवाजी महाराजांनी बळकावल्यामुळे इ.स. १६५९ साली आदिलशहाने दरबारात शिवाजी महाराज यांना संपविण्याचा विडा ठेऊन त्याच्या सरदारांना चित्कारले. आदिलशहाच्या दरबारातील मात्तबर अफझलखान ने हा विडा उचलत शिवाजी महाराजांना संपवण्याचा पण घेतला. मोठ्या फौजफाट्यासह अफझलखान मोहीम फत्ते करायला निघाला. येताना भवानी माता मंदिर आणि पंढरपूरचा विठ्ठलाच्या मंदिराची विटंबना केली. पुढे चाल करत अफझलखान वाईजवळ आला. शिवाजीराजांनी गर्द झाडीत दडलेला महाबळेश्वर जवळील प्रतापगड वर आश्रय घेत त्यास तोंड देण्याचे ठरवले. शिवाजी राजांनी थेट लढण्यापेक्षा चातुर्य दाखवत तहाची बोलणी सुरू केली. शिवाजी महाराज यांनी अफजलखानाला खेळवत ठेवले. शिवाजीराजांच्या वकिलांनी (पंताजी गोपीनाथ बोकील यांनी) अफझलखानाला गळ घालून शिवाजी महाराज प्रतापगडावरच भेट देतील असे बोलत अफजल खानाला भेटीस बोलावले. भेट देण्याच्या काही अट शिवाजी महाराज यांनी दिल्या, त्यात दोन्ही पक्षांकडील मोजकीच माणसे भेटीसाठी येतील आणि दरम्यान सर्वांनी नि:शस्त्र राहण्याची अट महाराजांनी घातली. ती अट स्वीकारत अफजलखान भेटीस राजी झाला.
शिवाजीराजांनी अफझलखानच्या दगाबाज स्वभावाची पूर्वकल्पना होती. अफजलखानाने आधी असेच अनेक शत्रूंना भेटीस बोलवून दगा देत मारल्याची महाराजांना कल्पना असल्यामुळे त्यांनी सावधगिरी म्हणून अंगात चिलखत घातले आणि सोबत बिचवा तसेच वाघनखे ठेवली. बिचवा चिलखतामध्ये दडवला होता तर वाघनखे हाताच्या पंजाच्या आतमध्ये राहतील अशी बनवली होती. शिवाजी महाराजांसोबत जिवा महाला तर अफझलखानसोबत सय्यद बंडा असा दांडपट्टेबाज होता. प्रतापगडावर भेटीसाठी एक शामियाना उभारला गेला त्यात भेट ठरली. अफजलखानाला भुलवण्यासाठी महाराजांनी शामियाना हिरे मानके यांनी सजवला. अफजल खानला हिरे मानके यांचा मोह असल्याचे त्यांनी माहिती काढली होती. अफजल खान आधी शामियान्यात आला, तो शामियाण्याची सुंदरता बघून मोहून गेला. थोड्या वेळाने शिवाजी महाराज भेटीस आले. स्वागताची मिठी मारण्याच्या बहाण्याने धिप्पाड अफझलखानाने शिवाजी महाराजांना आपल्या बगलेत पकडले. अफझलखानने आपल्याकडील कट्यारीचा वार शिवाजी महाराजांवर केला परंतु चिलखत असल्याने शिवाजीराजे बचावले. अफझलखान दगा करणार याचा अंदाज असलेल्या शिवाजीराजांनी आपल्या बोटात लपवलेली वाघनखे खानाच्या पोटात घुसवली. अफजलखान प्राणाच्या आकांताने दगा दगा म्हणून ओरडू लागला. त्याची आरोळी ऐकून सय्यद बंडा तत्क्षणी शिवाजीराजांवर चालून आला, त्याने राजांवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला जो तत्पर जिवा महालाने स्वतःवर झेलत शिवाजीराजांचे प्राण वाचचले. “होता जिवा म्हणून वाचला शिवा” ही म्हण प्रचलित झाली.
त्यानंतर शिवाजी महाराजांनी आपला गनिमी काव्याचा वापर करत आपले झाडीझुडपात लपलेल्या सैन्यासह अफजल खानच्या सैन्यावर हल्ला केला. सहिष्णु शिवाजी महाराज यांनी अफझलखानाच्या मृत्यूनंतर त्याच्या शवाचे अंत्यसंस्कार इस्लामी पद्धतीने करून त्याची एक कबर प्रतापगडावर बांधली.

पावनखिंड लढाई: बाजीप्रभु देशपांडे


अफजलखानाचा कोठळा काढल्यानंतर आदिलशहाने सिद्धी जौहर ला शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यास पाठवले. सिद्धी जौहर ने शिवाजी महाराज स्थित पन्हाळगडाला वेढा देत शिवरायांची जायबंदी केली. त्या वेढ्यातून सिद्धीला तुरी देत राजे सैनिकांसहित सुटत विशालगडाकडे रवाना झाले. शिवाजी राजेंचा पाठलाग करणाऱ्या सिद्धीच्या सैन्याने त्यांना घोडखिंडीत गाठले आणि लढाई सुरू झाली. तेव्हा शिवाजीराजांचे विश्वासू सरदार बाजीप्रभु देशपांडे यांनी शिवाजीराजांना तिथून निसटून जाण्याची विनंती केली. “लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे” म्हणून बाजीप्रभु देशपांडे यांनी राजेंना विशालगडाकडे पुढे कूच करायची विनंती केली.
शिवाजीराजांना ते पटेना पण ‘बाजी’च्या विनंतीवजा हट्टापुढे त्यांनी यास मान्यता देत विशालगडाकडे कूच केली. बाजीप्रभु देशपांडे यांनी आपल्या शौर्याची सीमा गाठत सिद्दीच्या सैन्याला रोखून धरले. संख्येने अधिक असलेल्या सैन्याला बाजीप्रभु आणि त्यांच्या सहकार्यांनी आपली प्राणांची बाजी लावत झुलवत ठेवले. शिवाजीराजे गडावर पोहोचल्याचा संदेश समजल्यावरच बाजी प्रभु देशपांडे यांनी आपले प्राण सोडले. शिवाजी राजांनी असे साथीदार तयार करून स्वराज्य स्थापन केले आणि त्याच्या वाढीस अशा अनेक सरदारांनी आपल्या राजासाठी प्राणांची आहुती दिली. शिवाजीराजांनी या घोडखिंडीचे नाव ‘पावनखिंड’ असे बदलून बाजीप्रभु देशपांडे यांच्या बलिदानाची आठवण जागवत ठेवली.

शिवाजी महाराज आग्य्राहून सुटका

मिर्झाराजे जयसिंग यांच्याबरोबर झालेल्या तहानुसार इ.स. १६६६ साली औरंगजेबाने शिवाजीराजांना दिल्ली येथे भेटीसाठी बोलाविले. त्यानुसार शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारी त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी पोहचले. त्यांच्यासोबत नऊ वर्षांचे राजपुत्र शंभूराजे देखील होते. परंतु दरबारात त्यांना कनिष्ठ सरदारांच्या समवेत उभे करून त्यांचा अपमान केल्याने शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचा पाणउतारा करत तडक दरबाराबाहेर पडले, चिडलेल्या औरंगजेबाने त्यांना अटक करून नजरकैदेत ठेवले.
शिवाजी महाराजांवर कडक पहारा ठेवला गेला होता. शिवाजी महाराज यांनी सुटकेचे केलेले प्रयत्न फोल ठरत होते. शेवटी शिवाजीराजांनी एक योजना आखली. त्या योजनेनुसार त्यांनी आजारी पडल्याचे नाटक केले. त्यांची प्रकृती स्थिर व्हावी यासाठी मंदिरांना व दर्ग्यांना मिठाईचे पेटारे भेट देऊ लागले. रोजच्या तपासणीला कंटाळलेले पहारेकरी मिठाईचे पेटारे तपासण्यात आळस दाखवू लागले याचा फायदा घेत महाराजांनी पेटार्यात लपून कैदेतून सुटका केली. काही वेळाने पहारेकऱ्यांना हि बाब लक्षात आली तोपर्यंत शिवाजी महाराज दूर पोहचले होते. औरंगजेबाला तुरी देत त्याच्या कैदेतून सुटणारा चातुर्यवान राजा म्हणून शिवाजी महाराजांचा गौरव होत राहिला.
शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक

रायगडावर ६ जून इ.स. १६७४ रोजी शिवाजी महाराजयांनी गागाभट्ट यांच्याकडून आपला राज्याभिषेककरवून घेतला. राज्याभिषेक सोहळा साठी त्यांनी ३२ मण सोन्याचे सिंहासन बनवुन घेतले. एक मोठा भव्यदिव्य असा राज्याभिषेक सोहळा पार पडला. रयतेला राजा मिळाला. त्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले. रायरीचे नाव रायगड असे बदलले. अनेक देशी विदेशी राजे सरदार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

शिवाजी महाराज मृत्यू 


शिवाजी महाराज यांचा मृत्यू ३ एप्रिल १६८० रोजी रायगड किल्ल्यावर झाला. सबंध रयतेला पोरक करून रयतेचा राजा वयाच्या ५० व्या वर्षी स्वराज्य सोडून गेला. महाराणी पुतळाबाई या महाराजांच्या चितेवर सती गेल्या. महाराणी सोयराबाई आणि मंत्रिमंडळाने संभाजी महाराज यांना याचा कानोसा लागू न देता राजाराम महाराज यांचा राज्याभिषेक करण्याचा घाट बांधला. राजाराम यांना गादीवर बसवल्यानंतर सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना संभाजी महाराज यांना कैद करण्यास पन्हाळ्यावर पाठवले. परंतु हंबीरराव मोहिते यांनी संभाजी राजांना मदत करत रायगड ताब्यात घेतला. स्वराज्याचे युवराज छत्रपती झाले.
शिवाजी महाराजांची कारकीर्द पुढे त्यांच्या मोठा सुपुत्र संभाजी महाराज यांनी मोठ्या चातुर्याने आणि सामर्थ्याने सांभाळली. संभाजी महाराज हे मरेपर्यंत अजिंक्य राहिले आणि शिवाजी महाराज इतिहास अजरामर करून गेले.

                -------//-------//--------//---------

No comments:

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामगा ता.निलंगा जि.लातूर