● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

● जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेळंब,ता.देवणी जि.लातूर ●

वाचनकट्टा

Wednesday 30 October 2019

पोलादी पुरूष वल्लभभाई पटेल

पोलादी पुरूष वल्लभभाई पटेल


स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि कराची कॉग्रेस अधिवेशनाचे (१९३१) अध्यक्ष पोलादी पुरूष वल्लभभाई पटेल यांचा जन्म गुजरातमधील नडियाद येथे ३१ ऑक्टोबर १८७५ झाला. लहानपणापासूनच संघटन कौशल्य असणार्‍या पटेल यांना साहस आणि राष्ट्रभक्ती त्यांच्या वडिलांकडून पिढीजात मिळाली होती. त्यांचे वडील जवेरभाई राणी लक्ष्मीबाई यांच्याबरोबर स्वातंत्र्याची पहिली लढाई लढले होते. 

वल्लभभाई उच्च शिक्षणासाठी १९१० साली इंग्लंडला गेले. १९१३ मध्ये त्यांनी वकिलीस सुरुवात केली. गांधीजींनी केलेल्या आवाहनाने १९१७ मध्ये ते गुजरात सभेचे सचिव या नात्याने स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय झाले. १९१८ मधील खेडा सत्याग्रहात गांधीजींचे जवळचे सहकारी म्हणून ते कार्यरत झाले आणि वकिलीला रामराम ठोकला. 

वल्लभभाई पटेल यांनी १९२८ मधील बार्डोली तालुक्यातील कर आंदोलनाचे त्यांनी नेतृत्व केले. येथून त्यांना 'सरदार' ही उपाधी मिळाली. मिठाच्या सत्याग्रहात पकडले जाणारे ते एक प्रमुख राष्ट्रीय नेते होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली कराची मधील कॉग्रेस अधिवेशनात गांधी-आयर्विन करार मांडला. पटेल यांनी तीव्रपणे स्वातंत्र्यासाठी आवाज उठविल्याने ते जानेवारी १९३२ ते मे १९३३ पर्यंत गांधीजींसह १६ महिने येरवडा तुरुंगात राहिले.

यानंतर एक वर्षासाठी ते नाशिकच्या तुरूंगात राहिले. १९४० च्या वैयक्तिक सत्याग्रहात त्यांना पुन्हा अटक झाली. स्वातंत्र्याच्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या सरदार यांना देशे स्वातंत्र्य झाल्यानंतर गृहमंत्रीपद देण्यात आले. भारतात सामील होण्यास नकार देणार्‍या संस्थानांवर सैनिक कारवाई करून त्यांनी आपल्यातील पोलादी पुरूष दाखवून दिला. १५ डिसेंबर १९५० रोजी त्यांचा मृत्यू झाला. सरदार पटेल यांना मृत्यूनंतर 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

' बहुसंख्यांक आपली जबाबदारी ओळखत नसतील, तर हे देशाचे दुर्भाग्य असेल. जर मी अल्पसंख्याक समुदायाचा असतो तर हे विसरून गेलो असतो की मी अल्पसंख्याक आहे.' हे त्यांचे प्रसिद्ध वाक्य आहे. देशाची एकता आणि स्वातंत्र्याचे रक्षण त्यांचे जीवनाचे लक्ष्य होते. नाविकांच्या विद्रोहाला देखिल त्यांनीच इशारा देऊन शांत केले. घटनासभेत देखिल देशाची एकता भंग पावू नये याची दक्षता त्यांनी घेतली. देशाच्या एकतेसाठीच हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यात आला. याबरोबरच सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करून लयास गेलेले वैभव पुन्हा मिळवून देण्याचे कार्यही त्यांनी केले.


लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेलांबद्दल ह्या ८ महत्वपूर्ण गोष्टी

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान देत कणखर बाण्याने प्रत्येक गोष्टीला सामोर जाणारा लोहपुरूष म्हणजे ‘सरदार वल्लभभाई पटेल’ होय. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि पहिले उपपंतप्रधान म्हणून देखील जगाला त्यांची ओळख आहे. ३१ ऑक्टोंबर १८७५ रोजी जन्मलेल्या सरदार पटेलांनी जन्मभर भारतमातेच्या कल्याणासाठीच आयुष्य वेचत १५ डिसेंबर १९५० रोजी अखेरचा श्वास घेतला. हे महान व्यक्तिमत्त्व म्हणजे आपल्या देशाला मिळालेली दैवी देणगीच म्हणावी लागेल.

अश्या या थोर पुरुषाबद्दल आज काही रंजक गोष्टी जाणून घेऊया:

१) पटेलांना शिक्षणाची खूप आवड होती. त्यांनी गुजरातमधील गोध्रा, बोरसाड आणि आनंद येथे कायद्याचा अभ्यास केला. बार परीक्षा पास झाल्यावर त्यांनी आपल्या वरिष्ठ वकिलांकडून पुस्तके उसनी घेतली होती.

२) वयाच्या ३६ व्या वर्षी सरदार पटेल यांनी इंग्लंड गाठले आणि बॅरिस्टरसाठी असणाऱ्या शाळेत प्रवेश घेतला. त्यांनी ३६ महिन्यांचा अभ्यासक्रम ३० महिन्यांतच पूर्ण करून दाखवला.

३) स्वातंत्र्यप्राप्तीच्या चळवळीत जेव्हा सरदार पटेलांनी सहभाग घेतला, तेव्हा त्यांना ना राजकारणात रस होता, ना गांधीच्या विचारधारेत. परंतु गोध्रा येथे त्यांची आणि गांधीची भेट झाली तेव्हा ते प्रभावित झाले आणि त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सरदार पटेलांना गुजरात सभेचे सचिव पद देण्यात आले. इथूनच सरदार पटेल एक राजकारणी म्हणून घडत गेले.

४) गांधीच्या सांगण्यावरून पटेलांनी नोकरी सोडली आणि खेड्यामधील कर मुक्तीच्या आंदोलनात ते सक्रीयरीत्या सहभागी झाले.

५) गांधींच्या असहकार चळवळीच्या निमित्ताने सरदार पटेलांनी पश्चिम भारताचा दौरा केला आणि तब्बल ३००० सदस्यांना चळवळीत सहभागी करून घेतले. तसेच पक्षनिधीसाठी त्यांनी त्याकाळी जवळपास १५ लाखाचा निधी स्वत:हून गोळा केला.

६) गुजरात राज्यातील व्यसनाधीनता, अस्पृश्यता, जातीभेद आणि महिलांवरील अत्याचार या समस्यांविरुद्ध त्यांनी स्वत: पुढाकार घेत नेटाने लढा दिला.

७) जेव्हा महात्मा गांधींना अटक झाली होती तेव्हा भारतीय तिरंगा फडकावण्यावर ब्रिटिशांनी घातलेल्या बंदीच्या कायद्याविरोधात १९२३ साली नागपूर मध्ये सुरु केलेली सत्याग्रह चळवळ पुढे नेण्याची जबाबदारी सरदार पटेलांना देण्यात आली.

८) स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि पहिले उपपंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळताना त्यांनी अतिशय मोलाचे योगदान देत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.

                               ---//---

No comments:

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामगा ता.निलंगा जि.लातूर